Tuesday, May 5, 2020

कवी ग्रेस : इराणी संगीताच्या प्रतिमा



आपोआप हलतात इथल्या वाळूवर इराणी
संगीताच्या प्रतिमा...

मला आलिंगनात मरण तसा रात्रीचा शृंगार,
तुझे चांदरातींचें अर्थनिळें मन....
कुठें याच्याही पलीकडे, कुठें त्याच्याही पलीकडे संपूर्ण
अवकाशाला टाळून फक्त वाऱ्यालाच ऐकूं येईल
अशी सारंगीची पिपासा
जशा इराणी संगीताच्या प्रतिमा ....

वाळू पसरली देहापार, कुणाच्या नादांत?
कुणाच्या शोधांत?
स्वरसिद्ध तिचे अनंत कण; रेषाबद्ध उंटांच्या
मानेंत जसें चंद्रबन...
कुणी दिसत नाहीं; नाहीं दिसत एवढ्या प्रचंड
टापूंत मला, कुण्या युगांत येथे झाडें उगवलीं
असतील त्या डोळ्यांचा निरंगी नश्वर सुरमा,
जशा इराणी संगीताच्या प्रतिमा...

मज्जेच्या खालीं तळमळणारे फुलांचे दैवी घोस...
कीं कुण्या वैदेहीची पंथविराम गुणगुण?
शिशिराच्या मागें वाजवी सूत्रधाराची धून...
नभ एवढें विराट, माझें नाहीं तसें तुझेंही नाहीं या
वाळूच्या सप्तरंगी कणांचें अज्ञातपण
फक्त दु:खाच्या देखाव्यांना दिशाबद्ध
करणारें पिरॅमिडांचे अधांतर  
                           ग्रेस- ( संध्याकाळच्या कविता पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९६७)
-----------------------------------------------------------------------------------------------------
       कवी ग्रेस यांची संध्याकाळच्या कविता मधील ही एक कविता. ती एखाद्या अमूर्त चित्रासारखी (abstract Paintings) आहे : अमूर्त चित्र डोळ्यासमोर दृश्य उभे करते, ते अस्पष्ट असते; त्यातील रंग रेषा, फटकारे आपल्याला मोहून घेतात, पण अर्थ कळत नाही; तो चित्रकाराचा हेतूही नसतो, तरी चित्रासमोरून आपण हलत नाही. कारण तर्क, अर्थ, अन्वय, वास्तव यांच्या पलीकडची स्पंदने त्यात उमटलेली असतात. त्यात अर्थ नसतो तर संवेदना असतात. असे चित्र रसिकाच्या संवेदनेलाच आवाहन करीत असते. या संवेदनांच्या गुंतवळ्यातूनच तर रसिकाला चित्रकाराचे मूडस जाणवतात. जाणिवेच्या पलीकडील नेणीवप्रधान अवस्थेत रसिक पोचतो, त्या अवस्थेचे वर्णन त्याला करता येत नाही पण ती अवस्था मात्र तो अनुभवतो. त्याचे मन त्या चित्रातील मूड्सप्रमाणे त्या त्या भावनांच्या हिंदोळ्यावर झुलत असते.
ग्रेस यांची कविताही वाचकाला अशा मूड्समधेच नेते. अशा मूडसचा नेमका अर्थ न लागल्यामुळे तथाकथित वाचनसुलभ परंपरेने ग्रेसला दुर्बोध कवी ठरवले आणि तरीही त्या कवितांचा अर्थ शोधण्याची धडपडही केली.
            ग्रेस यांची कविता कोडे नाही. ग्रेस यांची कविता उखाणा नाही. त्यामुळे तिची सोडवणूक करणे उलगडा करणे, अर्थ सांगत बसणे या क्रियादेखील तितक्याच दुर्बोध किंवा निरर्थक ठरतात. आता एखादा सांगतोच म्हणतो अर्थ तर आपण कशाला बोला? कारण अमूर्त चित्र पाहून त्यात नदी दिसते, घोडा आहे वगैरे सांगणारे असतातच की! पण हे लक्षात घ्या, चित्रात जे दिसते त्याचा अर्थ किंवा संबंध चित्रकाराला तोच अभिप्रेत आहे असे नसते. निर्मितीच्या क्षणी त्या कलावंताला आपल्या भावना आणि संवेदनांना ज्यातून आणि जशा व्यक्त कराव्याशा वाटतात, तसतसे रंग, आकार, फटकारे, कुंचल्यावरचा दाब, ताण, स्ट्रोक तो साकारतो. ते काढून झाल्यावरही त्याची तीच भावना असत नाही, किंवा पुन्हा तेच चित्र  पाहताना तीच प्रक्रिया घडत नाही. ही कलावंताची मर्यादा नव्हे तर तो मानवी मनाचा स्वभाव आहे.  
ग्रेस या मानवी स्वभावासह, या मानसिक प्रकियेसह आणि कलावंताच्या व्यामिश्र व्यक्तिमत्त्वासह त्यांच्या कवितेत प्रकटतात. ते वास्तवसंबोधन असणाऱ्या पण त्यांच्या नेणिवेला साकारणाऱ्या प्रतिमा वापरतात, त्यामुळे त्यात संबोध  वास्तविक असला तरी अर्थ कविगत असतो. म्हणजे कवीने घोडा, नदी, चांदणे, कावळा उर्मिला वगैरे शब्द वापरले जे वास्तव आहेत, त्यांचा निर्देश सांस्कृतिक आहे, तरी त्याचा हा परिचित अर्थ ग्रेसला अभिप्रेत नसतो. ते त्याला अ-सांस्कृतिक आणि काव्यगत करतात. थोडक्यात आपल्या सोयींचा अर्थ घेतात. अमूर्त चित्रात हिरवा रंग निसर्गाचा, निळा आकाशाचा असे नसते, रंगांचे हे प्रचलित अर्थसंकेत चित्रकार बदलून त्याला स्व:सापेक्ष संदर्भाचे अर्थ प्रदान करतो. हे इतर कलेत योग्य, पण साहित्य या अर्थप्रधान कलेत कितपत योग्य? हा भाग अलहिदा. पण ग्रेस साहित्यकलेला अर्थप्रधान नाही तर संवेदनाप्रधान कला मानतात हे लक्षात घ्या. त्यामुळेच त्यांचे काव्य वाचल्यावर ग्रेसशी थेट संवाद होत नाही. संवादाच्या (Communication) परिचित प्रक्रियेला ग्रेस तडा देतात. म्हणजे ग्रेसची कविता हा कवीचा आत्मसंवाद असतो. वाचकाचा कवितेशी संवाद होतो, कवीसोबत नाही.
भारतीय साहित्यशास्त्र कवी-कविता-रसिक अशी तीनपदरी संवादप्रक्रिया मानते, मर्ढेकर कवी-कविता आणि कविता- रसिक असा दुपदरी संवाद मानतात. ही मर्ढेकरी प्रक्रियाच ग्रेस यांना मान्य आहे. म्हणून ते कवितेतून वाचकांशी संवाद साधत नाही तर कवितेशीच संवाद साधतात. हे सूत्र लक्षात घेऊन त्यांच्या कवितेकडे जायला हवे. म्हणजे त्यांची कविता पूर्वसूरींहून वेगळी, अपारंपरिक, वाचकसुलभता टाळणारी आणि कवितेपेक्षा चित्राच्या पदवीला जाऊन पोचणारी कशी आहे ते कळते.
ग्रेस कवितेला साहित्यकलेपेक्षा वरचा दर्जा देऊ पाहतात. म्हणजे काव्य अर्थापेक्षा संवेदनेच्या पातळीवर प्रकट व्हावे, जे संगीत, चित्र, नृत्य, शिल्प या कलांमध्ये घडते, अशी त्यांची भूमिका आहे. या कला अर्थापेक्षा संवेदनावर आधारलेल्या आहेत. रसिक आस्वाद घेताना अर्थापेक्षा श्रुती आणि दृश्य या संवेदनेच्या पातळीवर पोचतो. कवीही अर्थापेक्षा संवेदना प्रकटीसाठीच धडपडतो. ग्रेस यांच्या कवितेत हेच घडते. ग्रेस यांनी इतरत्र म्हटले आहे:
भाषाच ही निकामी शब्दास ही पुरेना
संवेदनाच द्यावी अर्थास काय पुन्हा ?
याचा अर्थ काय? एक, ग्रेस साहित्यकलेला निव्वळ सौंदर्यकला म्हणजे ललित कला म्हणून पाहतात. दोन, त्यांची ही भूमिका जीवनवादी नाही, कलावादी आहे. केवळ संवेदनांवर आधारलेला अनुभव अर्थ निरपेक्ष असला तरी तो विशुद्ध सौंदर्यानुभव असतो, असा विशुद्ध अनुभव भावना आणि संवेदना यांच्या लयतत्त्वाने इतर कलांप्रमाणेच साहित्यात प्रकटावा ही मर्ढेकरांची भूमिका कवी ग्रेस यांनी आत्मसात पूर्णपणे केली आहे. मर्ढेकरी सौंदर्यशास्त्राचे मराठी कवितेत कुणाला प्रात्यक्षिक पहावयाचे असेल तर ते ग्रेस यांच्याच कवितेत. तर अशा अर्थनिरपेक्ष कवितेचा अर्थ शोधू पाहणाऱ्यांनी तिला दुर्बोधतेच्या गर्तेत ढकलले तर नवल काय?
एवढी पार्श्वभूमी घेऊन ग्रेसच्या इराणी संगीताच्या प्रतिमा या कवितेकडे जाऊ.
दृक-श्राव्य संवेदनांची गुंफण
या कवितेचा आता अर्थ सांगणे नाही, तर तिच्या आस्वादातून काय जाणवले? कोणते मूड्स, जाणवले ते सांगणेच हाती आहे. अमूर्त चित्रात काय रंगविले हे सांगायचे नसते, काय जाणवते तो आत्मप्रत्ययच व्यक्त करायचा असतो. ग्रेस यांच्या इतर कवितेप्रमाणेच ही कविताही गूढ धुकेच वाटू शकते. आपोआप हलतात इथल्या वाळूवर इराणी संगीताच्या प्रतिमा या ओळीनेच आपण कवितेकडे ओढले जातो. इराणी संगीत, मग वाळू, मग त्यावरच्या प्रतिमा, त्याही आपोआप हलताहेत असे कवी म्हणतो, तेव्हा आपण अधिक बुचकळ्यात पडतो..
 एक लक्षात घ्या, आपल्या डोळ्यांसमोर दृश्य उभे राहत असले तरी, ग्रेस येथे दृश्य सांगत नाहीत तर दृश्याबद्दलची भावस्थिती सांगत आहेत. या भावस्थितीमुळे थोडे दृश्य संवेदनेचे तुकडे आपल्या हाती लागतात, त्यासाठी कवीने ज्या शब्दांवर स्ट्रोक- भर दिला आहे, ते पाहू- वाळू, रेषाबद्ध उंटांच्या माना, एवढ्या प्रचंड टापूंत, नभ एवढे विराट, पिरॅमिडांचे अधांतर.. यांतून आपल्या समोर वाळवंटाची दृश्य संवेदना जागी होते. विराट पसरलेले वाळवंट, त्यावर उंटाचे रेषाबद्ध मान हलवत जाणे, त्यांच्या सावल्यांच्या प्रतिमा वाळूवर उमटणे आणि त्यांच्या चालण्यामुळे त्या आपोआप हलत आहेत असे कवीला जाणवणे असे या भावस्थितीचे स्वरूप आहे.
पण कवी केवळ दृश्य संवेदनेवर थांबत नाही, त्याच्या जोडीला इराणी संगीत म्हणजे श्रुती संवेदनाही आहे. आता या संवेदनेचे कवितेत विखुरलेले तुकडे पाहू: इराणी संगीत, फक्त वाऱ्यालाच ऐकूं येईल अशी सारंगीची पिपासा, वैदेहीची पंथविराम गुणगुण, शिशिराच्या मागें वाजवी सूत्रधाराची धून .. इकडे लक्ष दिले की ग्रेस दृश्य संवेदनेत श्रुती संवेदनेचे मिश्रण कसे बेमालूम पण नकळत करतात ते लक्षात येते. वाचकाला ते या मिश्र संवेदनांत कसे बुडवून टाकतात आणि शब्दांच्या माध्यमातून ते वाचकाचा कब्जा घेऊन त्याच्यावर गारुड कसे करतात, ते स्पष्ट होते.
भावना विविधतेचे मिश्रण
      केवळ संवेदनाच नव्हे, भावनाही ग्रेस व्यक्त करीत जातात. या कवितेत, निराशा, उदासी, एकटेपणा, हताशपणा, प्रेम, प्रणय, कामगंड, भक्ती, मानवी जीवन आणि अस्तित्त्वाची अतर्क्यता, त्यामुळे निर्माण झालेली साशंकता, शृंगाराची आसक्ती आणि मृत्यूचे भय अशा विविध भावना एकत्र दाटून आल्या आहेत.
     या भावना कशा प्रत्ययास येतात पाहा: मला आलिंगनात मरण तसा रात्रीचा शृंगार या ओळीतून शृंगाराची आसक्ती, कामगंड आणि मृत्यूचे भय दिसून येते. वाळू पसरली देहापार, कुणाच्या नादांत? कुणाच्या शोधांत? यातून मानवी अस्तित्व आणि देह यांचा घेतलेला तीव्र वेध, मानवी जीवन आणि अस्तित्त्वाची अतर्क्यता यांचा शोध दिसतो. या शोधातच कवीला जाणवते की, कुणी दिसत नाहीं; नाहीं दिसत एवढ्या प्रचंड टापूंत मला.. या अनुभवातून एकाकीपणा आणि त्यातून प्राप्त होणारे दु:ख, निराशा, उदासी, एकटेपणा, हताशपणा यांनी कवीचे मन व्यापून जाते.
या अवस्थेतच कवीला मग सृष्टी, विश्व, अस्तित्व निर्मितीचा प्रश्न छळत जातो. कुण्या युगांत येथे झाडें उगवलीं असतील असे तो विचारत जातो. हे एवढे विराट विश्व पण त्यावरही मानवी सत्ता नाही असा नियतीवादही ते कसे सांगतात पाहा: नभ एवढें विराट, माझें नाहीं तसें तुझेंही नाहीं. या ओळीतून अस्तित्त्वाच्या कोणत्याच गोष्टींवर मानवाची सत्ता नाही याची खंत कवी व्यक्त करतो आहे हे दिसते. वाळूच्या सप्तरंगी कणांचें अज्ञातपण | फक्त दु:खाच्या देखाव्यांना दिशाबद्ध | करणारें पिरॅमिडांचे अधांतर या ओळीतून विश्वाची अफाटता, पण वाळूच्या कणांसारखी क्षुद्रता, त्याचे अनाकलनीय आणि दु:खद स्वरूप, आणि शेवटी प्राप्त होते ते मृत्यूचे पिरॅमिडरूपी थडगे, ही अर्थच्छटा जाणावते. अशाप्रकारे, मानवी जीवन, अस्तित्त्व आणि मानवी संस्कृती, व्यवस्था यांची निरर्थकता, अतर्क्यता आणि त्यातून आलेली साशंकता, दुबळेपणा कवी  व्यक्त  करत जातो.
 या प्रवाहातच कवीला सृष्टी, तिचे ऋतुचक्र आणि अशा सुंदर निर्मितीचा विलय करणाऱ्या अज्ञात शक्तीबद्दल प्रश्न पडतो. कवी म्हणतो: आणि या शिशिराच्या मागें वाजवी सूत्रधाराची धून...या ओळीतून विश्वाच्या निर्मितीच्या मागे असलेले तत्त्व आणि त्याची अनाकलनीयता, त्याच्या विषयीचे पडलेले प्रश्न कवी व्यक्त करत जातो. मज्जेच्या खालीं तळमळणारे फुलांचे दैवी घोस...इथे जीव निर्मितीच्या मुळाशी असलेली लपलेली तीव्र कामभावना याचा कवी वेध घेतो, मात्र या जीव व सृष्टीनिर्मितीच्या मागेच विनाशाची पावले आहे हे जाणवून कवी अधिक खिन्न होतो.
व्यष्टी आणि समष्टीची निर्मिती, त्यांचे अस्तित्व आणि विनाश यांबद्दलची भयभावना या कवितेत आहे. आपल्या दु:खाशी विश्वाचे दु:ख जोडून घेण्याचे संतांसारखे कारुण्यही या कवीजवळ आहे. मात्र संत सामान्यांना या आर्त आकांतातून मुक्त करतात, ते अपार्थिवाकडे नेतात, ग्रेस वाचकाला आकांतात बुडवून टाकतात, ते आपल्याला पार्थिवाकडेच नेतात.
 मला आलिंगनात मरण तसा रात्रीचा शृंगार | तुझे चांदरातींचें अर्थनिळें मन...| कुठें याच्याही पलीकडे, कुठें त्याच्याही पलीकडे संपूर्ण | अवकाशाला टाळून फक्त वाऱ्यालाच ऐकूं येईल | अशी सारंगीची पिपासा.. इथे कामपूर्तीच्या तीव्र प्रणयप्रसंगीच मनाच्या तळातून (मज्जेच्या) उगवून आलेली निरर्थकतेची, मृत्यूची, भयाची जाणीव भावना कवी व्यक्त करत जातो.
 इथे कवीने संवेदना आणि भावना यांची लयबद्ध गुंफण केली आहे. शिवाय जीवन चिंतनही आहे. म्हणून हा अनुभव नुसता रोमँटिक किंवा फॅशनेबल नाही. विचार, संवेदना आणि भावना यांची संबंधांच्या संबंधांमध्ये तर्क विरहित लय स्थापन केला की सौंदर्य निर्माण होते, या मर्ढेकरी सौंदर्यविचारांचे हे उत्तम प्रात्यक्षिक आहे.
            जीवन चिंतनाची डूब
      ग्रेसच्या कवितेत, मानवी जीवन, अस्तित्त्व, त्यांचा सनातन प्रवाह, त्यात मानवाचे क्षूद्र स्थान, हाती काहीच नाही ही अगतिकता, कवीचे अंतर्भूत मन, अंतर्मन, समूहमन, आदिममन यांसह असलेले समग्र व्यक्तिमत्त्व आहे. शिवाय संगीत, चित्र, शिल्पादी कलांचा अनुभवही आहे; आणि या सर्व चिंतनाला पार्श्वभूमीसारखे व्यापून असलेले संगीतही आहे. हे ग्रेसने ठरवून मुद्दाम केले नाही, तर त्यांच्या निर्मितिप्रक्रियेचे स्वरूपच तसे आहे. त्यांच्या कवितेचा शोध निर्मितिप्रक्रियेच्या आकलनातूनही घेता येईल. त्यांची निर्मितिप्रक्रियाही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाइतकीच गुंतागुंतीची आहे हे खरे. कसे आहे हे कवीचे व्यक्तिमत्व?
            अव्वल प्रतिभा आणि काव्यभाषाभान असलेला कवी   
      कवी ग्रेस हे एक लहरी अवलिया व्यक्तिमत्त्व होते हे साऱ्यांना माहित आहे, पण त्याचवेळी ते  कलासक्त व्यक्ती होते हे ठाऊक आहे ना? ग्रेस नागपूरला मॉरीस कॉलेजात मराठी शिकवीत आणि नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राचीन काव्य आणि ललित कला विभागात अभ्यागत प्राध्यापक म्हणून सौंदर्यशास्त्र शिकवीत. मी दोन्ही ठिकाणी विद्यार्थी होतो आणि त्यांच्या या रसाळ, भारवाही, मंत्रमुग्ध अध्यापनाचा अनुभवही घेतला आहे. ज्ञानदेव, जनाबाई, तुकारामादी कवीपासून पंडित आणि कालिदासादी संस्कृत कवींची अवतरणे त्यांना पाठ होती. भारतीय आणि पाश्च्यात्त्य सौंदर्यशास्त्र त्यांनी अभ्यासले होते. संगीत, नृत्य, नाटक, शिल्प, चित्र, चित्रपट या कलांची त्यांची अभिरुची अभिजात होतीच. शिवाय प्रवाही ओघवती भाषा आणि साहित्याचे माध्यम म्हणून तिचे स्वरूप यांची त्यांना उत्तम समज होती. यातून अत्यंत बुद्धिमान, अव्वल प्रतिभावंत आणि भावनोत्कट अशा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय होतो. शिवाय ते मनोव्याधीग्रस्त असून आणि आत्ममग्न आणि एकांतात जगत हेही आपल्याला ऐकून माहीत आहे.
             ग्रेस यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या निर्मितीत त्यांचे हे व्यामिश्र आणि गुंतागुंतीचे व्यक्तिमत्व समग्रपणे प्रकटते. निर्मिती जर समग्र व्यक्तिमत्त्वाचा अविष्कार असेल तर त्या निर्मितीत कवी त्याच्या गुणदोष, वृत्ती, प्रवृत्ती मन, अंतर्मन आणि आदिममनासह प्रकटणे गरजेचे आहे. तेच ग्रेस यांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे त्यांची कविता इतकी विदग्ध होते. हे सारे उस्फूर्तपणे घडते. उत्कट आत्माविष्काराची आतुरता हा श्रेष्ठ वाङ्मयीन गुण ग्रेस यांच्यात आहे.
            ग्रेस यांच्या कवितेच्या आस्वादासाठी त्यांची चरित्रात्मक समीक्षा पूरक ठरते. मात्र केवळ तोच आधार घेतला तर मात्र फसगत होण्याची शक्यता आहे. मानसशास्त्र, सौंदर्यशास्त्र, साहित्यशास्त्र, अस्तित्ववाद, आदिबंधात्मक अशा विविध दृष्टीकोन तिच्या आकलनासाठी सोबतीला घ्यावे लागतात.
            इराणी संगीताच्या...या स्पष्टीकरणाला पूरक ठरते ती ग्रेस यांची साहित्यकलेच्या भाषा या माध्यमाबद्दलची भूमिका. ती कळली की त्यांच्या दुर्बोधतेचे निरसन होते. ग्रेस म्हणतात, “जी भाषा आपण वापरतो ती सांस्कृतिक व सामाजिक अर्थाने पूर्ण वाकलेली आहे, तेव्हा सामाजिक अर्थाचे व सांस्कृतिक अर्थाचे बांडगुळ तिच्यावरून दूर सारले पाहिजे. म्हणजे सृजनात्मक कल्पनाशक्तीने तिला सतत तासत गेले पाहिजे. इतके की तिची आणि संवेदनेची भाषा एकच होईल. या क्रियेत नको असलेल्या भाषेचा जो जो स्तर आडवा येईल. त्यालाही तासले पाहिजे. अगदी या क्रियेच्या संपृक्तबिंदूपर्यंत हे जर झाले तरच शब्दांचा पद्मबंध हा शब्दांमध्येच स्वरांचा पद्मबंध निर्माण करू शकतो” [1]
            याचा अर्थच ग्रेस यांना कवितेची भाषा सामाजिक-सांस्कृतिक अर्थनिरपेक्ष करावयाची आहे आणि तिला विशुद्ध संवेदनेच्या म्हणजे संगीताच्या पातळीवर न्यायची आहे. ही भूमिका, मर्ढेकरांच्या अनेक संवेदनांची साहित्यकला भ्रष्ट आणि एका संवेदनेची (श्रुती) संगीतकला श्रेष्ठ या भूमिकेवर आधारलेली आहे.
            मात्र मिलिंद मालशे आणि अशोक जोशी, या लेखकद्वयांच्या मते, ग्रेस यांची ही भूमिका प्राग प्रणाली आणि सुझान लँगर यांच्या जवळ जाणारी आहे. लँगरच्या मते, “कलात्मक प्रतीके ही कोणत्याही प्रत्यक्ष अस्तित्त्वात असणाऱ्या वस्तूंचा निर्देश करत नाहीत, तर संवेदनांच्या आणि भावनांच्या घडणीचा प्रत्यक्ष अनुभव ही प्रतीके देतात” [2] कवी ग्रेस यांची काव्यभाषेबद्दलची ही भूमिका लक्षात घेतली की तिच्यावरच्या दुर्बोधतेचा शिक्का पुसता येतो. त्यांच्या कवितेतील प्रतीकांचे स्वरूप अ-सांस्कृतिक आहे हे लक्षात येते. ग्रेस यांच्या कवितेतील संगीत आणि काव्यानुभवाचे नाते स्पष्ट करता येते. महत्त्वाचे म्हणजे इराणी संगीताच्या प्रतिमा.. चे अधिक आकलन होण्यास पूरक ठरते.
      ग्रेस यांची भाषाविषयक भूमिका आणि त्यांच्या कवितेचे स्वरूप हा पुन्हा स्वतंत्र विषय आहे.
 



१. आधुनिक समीक्षा सिद्धांत, मिलिंद मालशे आणि अशोक जोशी, मौज प्रकाशन, मुंबई, २०००७, पृ. १० 
२. तत्रैव, पृ. ११

पूर्वप्रसिद्धी : 
१.  सर्वधारा, अमरावती, जुलै-ऑग-सप्टें, २०१३ 
२. कवितेचा अंत:स्वर, पद्मगंधा प्रकाशन, पुणे,  २०१८ 
(सदर लेख 'ग्रेस : वेदना आणि सौंदर्य'  संपा. अजय देशपांडे , विजय प्रकाशन, नागपूर, २०१५ ग्रंथात समाविष्ट )

No comments:

Post a Comment

कवी ग्रेस : इराणी संगीताच्या प्रतिमा

आपोआप हलतात इथल्या वाळूवर इराणी संगीताच्या प्रतिमा... मला आलिंगनात मरण तसा रात्रीचा शृंगार, तुझे चांदरातींचें अर्...